Friday, December 24, 2010

माझं शालेय काव्य संमेलन

माझं शालेय काव्य संमेलन


सकाळ सकाळ भाच्याने मला विचारले .....

मामा तुम्हाला कविता येते न हो .....मग जरा करा कि उगवती वर एकाध कविता .......

बाप रे ...मी डोळेच का उघडले ह्याचा शोध घेत होते ....आणि त्या रवीचा ह्या कवीशी काय संबंध आहे तो ? ते जाणून घ्याया लागलो ....
आता कुठल्याही क्षणी कविता कर अस म्हणणे म्हणजे सुलभ मध्ये बसून आर्त  भैरवी  गाण्यासारखे  आहे .....
म्हणजे जवळ पास शक्यच नाही ....
एकाध  वेळ काहींनाच जमते असे आहे ते .....

तरी नाही नाही म्हणता मला माझ्या भाच्या समोर .....माझी सारस्वत अशी प्रतिमा बनवायची असल्या कारणाने ....मी काही एक ओळी केल्या
उगवतीच्या ठिकाणी मी त्याला जवजवळ मावळूनच टाकले .....
बघ हा नीट लक्ष  दे ,आणि तसे ते दुसरी मराठी इयत्ता शिकणारे मुल माझे कवन ऐकू लागले ....
"हा सूर्य मावळतीचा
क्षणार्धार्त लांबला
डोईवरुनी  गेला अन
सागरात विसावला ,,,"

इतक्यात हा ....," मामा मी सूर्य उगवण्याची बोलत होतो ....."
आताचे शालेय मुले हि इतकी चाप्टर असतील ह्याची मला इत्यंभूत प्रचीती आली ...

अरे पुढे तरी ऐक ....
" त्याच्या त्या उष्ण झळा ही
झाल्या शिथिल संध्याकाळी
रात्रीची पांघरून  शाल
पुन्हा सकाळी उगवला ...."

बघ उगवला ना ......? मी आपला उगाच प्लासी ची लढाई जिंकल्यासारख तोंड करून बोललो ... तर ते ही आभार प्रदर्शन करण्यासाठी मांडीवर झोपलं.

चला माझ एक काम तर झालं ...
शब्द देखील कधी दगा देतील याची काही वेळ नाही .....तुम्हाला सांगतो ... रजा घेण्यासाठी  मायना नक्की काय लिहावा ह्यात कमीत कमी दोन अडीच तास घालवणारा मी ...... तिच्यासमोर मेघदुतातला कालिदास बनतो ..... तसे पत्र लेखन वाईट नाही माझे पण ....अजून एकही पत्राचा होकारात उत्तर आलेच नाही...... अगदी त्याही .....

परवाच शाळेतून मेल आला होता , कि यंदा शाळेतल्या काव्यसंमेलनासाठी माझा पदस्पर्श व्हावा ........
बापरे .... पदस्पर्श ..??? तो नक्की कुणी केला होता हे जेव्हा विचारले तेव्हा कळले की , सातवीतल्या एका मऱ्हाटी बहाद्दराने ते उतरवले होते ....
सातवी च्या मुलांना आता बाबासाहेब पुरंदरे ... वगैरे चांगलेच तोंडवळणी पडले होते ...म्हणून पदस्पर्श ....
मी न रहावता उत्तरात लगेच लिहून टाकले ' मी आज पर्यंत शाळेतल्या खालच्या पायरी पासून ते गच्चीच्या माळ्यापर्यंत सगळी कडे पदच काय तर थंडीत  पार्श्व भागाचे ठसे देखील उमटवून आलोय .., तर पदस्पर्श वगैरे ते काय ...? नक्की हजर राहणार ....'

झालं चला दुसर एक काम झालं ......

आता त्या दिवशी अध्यक्षीय भाषण मग आपलं नवकवी भाषण म्हणून आजच्या कविता कशा छान आहेत वगैरे वगैरे लिहून आणलेले बोलू लागलो ,
तर इतक्यात उपस्थित म्हातारबुवा म्हणजेच त्या वेळचे नवकवी ह्यांनी मला हटकले ....
की आमच्या काळच्या कविता कश्या यतार्थ होत्या हे पटवून देण्या साठी त्यांनी अक्षरशः माझ्या हातातून  माईक हिसकावून घेतला .....
मी म्हटले हेच काम ह्यांनी त्यांचा अगोदर त्या वेळीही केले असणार .....' काय करू काही दर्दी कवी असतातच इतके आग्रही ...'

तरी मग त्यांचा आम्ही ऐकून घेतले कारण त्यांनी तेच मुद्दे प्रस्तुत केले जे मी तिथे प्रसुतनार होतो ...
प्रत्येक संमेलनात हे असे काही तरी वादग्रस्थ झालेच पाहिजे हे म्हणजे काळ्या दगडावरील रेघच ...

बरे आता पर्यंत सगळे ठीक होते पुढच्या प्रश्नोत्तरातील फेरीत माझी गोचीच होणार होती इतकं नक्की ...
कारण आतापर्यंत माईक चा ताबा घेणारे प्रस्थापित साहित्यिक आता स्नेहभोजन आटोपण्यासाठी जाणार आणि इथे मी ह्या फेरीत मरणार ....हे ही विधीलेखीत ....

समोर बसलेल्या एका आठवी नववीतल्या मुलीने मला प्रश्न केला ...
" काका , तुम्ही वर्गात बसताना अभ्यास करायचे का कविता ...?"
आता तिने  मला काका म्हणणे म्हणजे अगदी कहरच ,
पण तो कहर चेहऱ्यावर  न दाखवता मी शांतपणे म्हणालो ," पोरी मी वर्गात असताना तुझ्या सारख्या सुंदर पोरींवर कविता करायचो "
आता ती ही जराशी वरमली होती , इतक्यात नेहमी टारगट ह्या गटात मोडणाऱ्या मुलाने उठून प्रश्न केला,
'' दादा , मी काय म्हणतो कविता लिहायची म्हणजे कशी रे ...?"
जरा हायसे वाटले .....,"
" अरे हाताने पेन धरायचा आणि मनाने शब्द रेखाटायचे .. झालं की मग तुझी कविता ..."
आणखीन एक गटणे ह्या प्रकारात मोडणारा रसिक मुलगा उभा राहिला आणि म्हणाला ," कविवर्य "
मुळात आता हा पुढे काय बोलणार ह्याची मी पु लं ना वाचून तयारी केलीच होती ....
तर हा ," कविवर्य , माझ्या साहित्य जीवनात मी तुमची बरीचशी पुस्तके वाचून काढल्या नंतर असे आढळून आले की आपण बहुदा प्रेमकाव्य जास्त लिहिले आहे ...तर इतर कविता आम्हास कधी वाचावयास मिळतील...?"

मी पुरता ठार झालो ह्या विधानाने ....म्हणजे माझे पुस्तक मी अजून काढले नाही आणि ह्याने ते वाचूनही काढले म्हटल्यावर गटणेचा  बाप कोण ? ह्याचे उत्तर साक्षात हाच .....
" अरे मित्रा माझ्या ओर्कुट आणि फेसबुक वरील कविता वाच म्हणजे तुला कळेल की मी फक्त प्रेम काव्य वगैरे लिहित नाहीच मुळी ....आणि इतर कविताही तिथेच आहेत तू नक्की पहा ..."
ह्यात त्याला काय हर्ष झाला कुणास ठाऊक .... ते उगाच उडी मारून जागेवर बसलं .....
आता पर्यंत येणाऱ्या जवळजवळ  सर्वच प्रश्नातले  हे काही निवडक प्रश्न  होत ..बाकीचे तुम्ही विचारू नका कारण मुद्द्याबाहेर सहसा मी बोलत नाही आणि लिहितही  नाही .....

एक प्रमुख प्रश्न  जो मला प्रकर्षाने जाणवला आवडला तो म्हणजे
" मी नाशकात अगदी शिरवाडकरांच्या तसेच मुंबईला पु लं च्या आणि त्या त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या ठिकाणी जाउन तिथे कविता लिहिण्याचा प्रयास केला ...
पण ते शक्य नाही झाले असे का होते ..?"
मला क्षणभर  हसूच आले .... हे म्हणजे मारुतीच्या देवळात गेल्यावर बारा हत्तींच बळ अंगात येते असे म्हणण्यासारखे ,
तरीही त्या भाबड्या प्रश्नाला त्याच्या निरागसतेचा लेप होता ....
मुळात ह्यावर मी ही काय ते उत्तर देऊ शकणार होतो  देव जाणे .....
...........................................................................................................
जरा २ ३ मिनिटांनी मी प्रयत्न केला ...." बघ हा कसे असते .... आपण ज्यांच्या ठिकाणी जातो त्या माणसांना अनुभवण्यासाठी ....त्यांचे विचार त्यांचे आचार समजण्यासाठी किव्वा आपल्यात भिनवून घेण्यासाठी ...
म्हणून मुळात आपण त्यांच्याच सारखे लिहू शकू हे काही शक्य नाही .. कवितेला, विचारांना मुळात स्थळ ,काळ, वेळ, पंचांग आणि मुळात म्हणजे ग्रहांची दशा अनुकूल नसतेच कधी ..
ते कधी तुमच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडतील तुम्हालाच कळणार नाही ...... त्या साठी फक्त मनाचा गाभारा मोठा करा ......म्हणजे विचार आपोआप तिथे वास करू लागतील शब्द राज्य करू लागतील .....
माझी आई म्हणते,' आपण झोपतो म्हणजे आपल्यातला आत्मा आपण मोकळा करतो ..स्वप्न म्हणजे आपल्या आत्म्याने इहलोकात केलेलं भ्रमण असते ....आणि तो जसा आपल्या शरीरात पुन्हा शिरतो तेव्हा आपल्याला जाग येते ....' तर कविता, लेख हे असेच आपल्या आत्म्याने केलेला आपल्याशी संवाद असतो ... तो तुम्ही मुद्दाम घडवून आणू शकत नाही .. त्या साठी मनाची अवस्था निर्माण व्हाही लागते .....मग तुम्हाला आपोआप सारे काही लिहिता येईल अगदी भागवत गीता देखील !!, ती ही कधीच न वाचता......... कारण त्यातच लिहिलंय आत्मा अमर आहे तो इहलोकात कुठे ही कधी जाऊ  शकतो .....मग तुम्ही ती वाचली असो किव्वा नसो त्याचे विचार आत्मा तुमच्या पर्यंत खेचून आणेलच ....कविता ही जशी अवस्था असते तशीच ती व्यक्त करण्याची म्हणजेच लिहण्याची व्यवस्था तुमच्यात  असावी लागते ....
जरा माझ्या ह्या त्रिवेणीत विशेष लक्ष द्या बर्र का ....
' का लिहाया लागलो कळलेच नाही
कधी लिहाया लागलो तेही कळले नाही .....
..
.
.
.
कवी होणे हातातल्या रेषेत नसते लिहिलेले ...'

म्हणून म्हणतो नुस्त स्वप्नात जगण म्हणजे काव्य करणे नाही ते लिहून ते  इतरांपर्यंत पोहचवण हे देखील महत्वाचे ....
म्हणून तू जे काही प्रयत्न केलास तो  भौतिक होता, तू  आत्मिक प्रयत्न कर जागेवरच तुला पु लं आणि शिरवाडकर नक्कीच हातात हात घालून भेटतील ...
मुन्नाभाईच्या गांधी सारखे .......... कारण त्या साठी तो रोग ही स्वतःला जडवून घ्यावा लागतो रे .... काय म्हणतात तो .....केमिकल  लोचा ..."

आणि संमेलन तूर्तास संपले ..............

;- सुजित ( धवल ध्रुव ) 

No comments: